Type Here to Get Search Results !

आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते एखतपूर केंद्र शाळेत प्रवेशोत्सव व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात


सांगोला (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, एखतपूर येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

  कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सवाद्य मिरवणुकीने झाली. यावेळी गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्या सिंधुताई मोहन आलदर, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, सरपंच वर्षाताई जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रतिक्षा नीलकंठ यांच्या हस्ते करण्यात आले. एखतपूर केंद्र शाळा, लिंगेवस्ती, जगतापवस्ती व रामरहीमनगर येथील शाळांमधील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. खाजगी शाळांमधून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या २० विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक हणमंत जाधव यांनी प्रास्ताविकात शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची, मिळालेल्या यशाची व आवश्यक भौतिक सुविधांच्या मागण्यांची माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगितले. स्वतःचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमातून झाल्याचा उल्लेख करून त्यांनी शाळेच्या आवश्यक मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, केंद्रप्रमुख सुखदेव लवटे, ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य हरिबा इंगोले (नाना), ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक दिलीप नवले, भारत मेटकरी, नीलकंठ मॅडम, ज्ञानेश्वर इंगोले, निसार इनामदार, काळेबाग गुरुजी, संजय बुरांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. ज्ञानेश्वर इंगोले यांनी आभार मानले. खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments