Type Here to Get Search Results !

चिलार निर्मूलनाने पाण्याची बचत होऊ शकते, लोकसहभाग मिळाल्यास संस्थेच्या वतीने मोफत जेसीबी दिला जाईल

                             


सांगोला (प्रतिनिधी) - जलसंवर्धन पंधरवाड्यानिमित्त माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने असे आवाहन करण्यात येत आहे की,  नदीपात्रातून व नदीच्या काठावर चिलार बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होऊन त्याचा पाणीसाठ्यावर परिणाम होतो. वर्षानुवर्षे चिलार बाभळीचे प्रमाण वाढत चालल्याने नद्या, ओढे, बंधारे कोरडे पडू लागले आहेत. चिलार बाभळीची मुळे शंभर फुटाहून खोल जात असल्याने जमिनीच्या पोटातील पाणी मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. माणदेशातील माण, कोरडा, अफ्रुका व बेलवण या नद्यांच्या पात्रात, नदी काठावर व त्यास मिळणाऱ्या ओढ्यावर चिलार बाभळीचे प्रमाण जास्त असल्याने पावसाचे पडणारे पाणी तसेच बंधाऱ्यात साठणारे पाणी चिलार बाभळीच्या शोषणाने लगेच संपते. या पाण्याची बचत व्हावी म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने लोकसहभागातून गेल्या १० वर्षापासून माण नदीपात्रातील चिलार निर्मूलनाचे काम चालू आहे. नदीपात्र स्वच्छ झाल्यामुळे चार-पाच वर्षापासून माण नदीपत्रात व त्यावरील बंधाऱ्यात पाणी टिकून राहते. चिलार बाभळी काढल्या तरी वर्ष दोन वर्षात पुन्हा पूर्ववत वाढतात व पाण्याचा अपव्यय वाढतो. त्याकरिता चिलार निर्मूलनाची लोकचळवळ निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे व चिलार निर्मूलनाचे सातत्य राहिले तरच भविष्यात पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्याकरिता नदीकाठची लाभार्थी गावे, ग्रामपंचायती, शेतकरी व नागरिक यांचा सहभाग वाढला पाहिजे. या अभियाना करता ग्रामपंचायत, शेतकरी, नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी होणार असतील आणि लोकांच्या सहभागातून चिलार निर्मूलनासाठी जेसीबी मशीन लावत असतील तर त्यांच्या मशीन बरोबर आमच्या संस्थेच्यावतीने मोफत मशीन पुरवठा केला जाईल. असे माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी मो. नं. ९४२००९३५९९ किंवा ९५५२८९२६७० या क्रमांकावर संपर्क साधावा असे संस्थेच्या वतीने करण्यात आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments